shikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा

प्राजक्ता चिटणीस


अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेकजणी कास्टिंग काउचच्या बळी पडत असल्याच्या बातम्या आपल्याला रोजच ऐकायला मिळतात. गावातील लोकांना तर या चित्रपटसृष्टीचे प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे तुला मुंबईला नेऊन अभिनेत्री बनवेन अशा प्रकारच्या आमिषांना तेथील मुली लगेचच बळी पडतात. काही वेळा तर या मुली अभिनेत्री बनण्याच्या आपल्या या स्वप्नाच्या मागे इतक्या वेड्या झालेल्या असतात की, त्यांचा गैरवापर केला जातोय हे देखील त्यांना कळत नाही. तुला मी टॉपची हिरोइन बनवेन असे सांगत भोळ्याभाबड्या मुलींवर काय अत्याचार केले जातात हे शिकारी या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आले आहेत.
सविताला चित्रपटात काम करण्याची प्रचंड इच्छा असते. तिचा पती भरत (प्रसाद ओक) देखील पूर्वी एक नाटककार असतो. त्यामुळेच या दोघांची ओळख झालेली असते. या क्षेत्रात आपल्याला यश मिळणार नाही याची जाणीव भरतला झाल्याने तो या क्षेत्रापासून दूर जातो. सविताने लग्न केले असले तरी ती संसारात कधीच खूश नसते. मी कधीतरी अभिनेत्री बनणार हेच तिच्या कायम डोक्यात असते. त्यांच्या गावात मुंबईवरून रघु (सुव्रत जोशी) येतो. गावात आल्यावर त्याचे मामा (भाऊ कदम) त्याचे लग्न फुलवासोबत (मृण्मयी देशपांडे) ठरवतात. फुलवा अतिशय अल्लड मुलगी असते. पती-पत्नी त्यांच्यातील नात्याविषयी देखील तिला काहीच कल्पना नसते. त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडायला लागतात. त्याचदरम्यान रघु सविताला पाहातो. सुरुवातीपासूनच मुलींच्या बाबतीत त्याची नजर अतिशय वाईट असते. तो सविताला आपल्या जाळ्यात अडकवतो. सवितादेखील अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत त्याच्यासोबत येते. मुंबईत आल्यावर सवितासोबत काय होते? या सगळ्या जाळ्यातून ती बाहेर पडते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. 
शिकारी या चित्रपटात कास्टिंग काऊच हा सध्या चांगलाच चर्चेत असलेला विषय हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट इतर मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरतो. चित्रपटाची कथा चांगली असली तरी शेवट तितकासा चांगला नाहीये. आता चित्रपटाचा शेवट काय असणार याविषयी नक्कीच उत्सुकता ताणली जाते. पण शेवट अगदीच निराशा करून जातो. चित्रपटाचा शेवट देखील तितकाच प्रभावी करता आला असता असेच चित्रपट पाहाताना वाटते. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, नेहा खान, प्रसाद ओक आणि सुव्रत जोशी यांनी त्यांच्या भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. त्यांच्या तुलनेत वैभव मांगले, भाऊ कदम, कश्मिरा शहा, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या भूमिका छोट्या आहेत. पण तरीही या कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. नेहा खान, कश्मिरा शहा यांनी या चित्रपटात खूपच तंग कपडे घातले आहेत. नेहाने शहरात आल्यानंतर तंग कपडे घातले तर त्यात काही नवल वाटले नसते. पण गावात वावरताना त्या दोघींना तंग कपड्यात दाखवणे खरंच गरजेचे होते का हा प्रश्न नक्कीच पडतो. कथेच्या मागणीनुसार चित्रपटात बोल्ड सीन असणे यात काही वावगं नाही. पण या चित्रपटात उगाचच बोल्ड सीनचा भरणा केला असल्याचे वाटते. शहारल्या मनात हे गाणे तर मर्डरमधील भिगे ओठ तेरे या गाण्यापेक्षा देखील अधिक बोल्ड आहे. 
मृण्मयी देशपांडेला पाहाताना कुंकूमधील मृण्मयी नक्कीच आठवते. तिच्यावर आणि सुव्रतवर चित्रीत झालेले बेडरूममधील दृश्य तर प्रेक्षकांना खळखळून हसवते. एकंदरीत एक वेगळा विषयावरचा चित्रपट म्हणून शिकारी पाहायला हरकत नाही. 

Comments